[news18marathi]'घाटी व नांदेड येथील 50 लोकांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर खटला भरणार'
सुप्रिया सुळेंचा इशारा
अमरावती, 3 ऑक्टोबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : गेल्या दोनचार दिवसात आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली केल्याची उदाहरणे समोर आली आहे. नांदेडमध्ये काही तासांमध्ये 31 लोकांचा जीव गेला. यात 12 लहान बालकांचा समावेश होता. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्ण दगावल्याची माहिती आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या निप्षाप लोकांच्या मृत्यूला हे ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार असून आम्ही खटला भरणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज अमरावतीमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरूवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या सरकारचं नियोजन नसल्यामुळे घाटी आणि नांदेड येथील 50 लोकांना जीव गमावावा लागला. आज 12 लहान बालकांचा जीव गेला, याला महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे, आम्ही खटला भरणार आहोत. राजकीय विषय म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने हा खटला भरू, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. आज शिंदे व फडणवीस तातडीने दिल्लीला गेले. मात्र, अजित पवार गेले नाही. यावर मात्र सुप्रिया सुळे यांनी बोलणे टाळत मी नांदेड, घाटी मृत्यू प्रकरणावर व्यस्त असल्याचे सांगितले.
नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये 21 लोक दगावली, यात 12 नवजात बालक दगावली. या बालकांच्या आईचा विचार केला का? महिलांना दुःख देण्याचे पाप सरकारने केलेलं आहे, या सरकार विरोधात खटला भरणार आहे. शिंदे सरकारने दोषी मंत्राचा राजीनामा घेतलाच पाहिजे. सरकारच्या चुकीमुळे पन्नास लोकं दगावली आहेत. शिंदे सरकारने पन्नास लोकांची हत्या केली आहे हा माझा आरोप आहे. सरकारचे काम तीन महिन्यांपासून बंद आहे, ट्रिपल इंजिन मधला एक घटक जाऊन देवेंद्र फडणीस यांना भेटला. कारण त्यांची नाराजी सुरू झाली. तीन महिन्याच्या आत हनिमून संपायच्या आतच नाराजी सुरू झाल्याची टीका सुळे यांनी केली.
जे जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना नोटीस पाठवतात, मी जेव्हा लोकसभेत बोलते तेव्हा माझ्या नवऱ्याला देखील इन्कम टॅक्स, सीबीआयच्या नोटिसा येतात. सदानंद सुळे त्याला लव्ह लेटर म्हणतात. राज्यातील सरकार हे असंवैधानिक कामे करत आहेत. कंत्राटी भरतीला आमचा तीव्र विरोध राहणार आहे, कंत्राटी भरती करत आहात तर पब्लिक सर्विस कमिशन कशासाठी आहे? मंत्रालय ही कंत्राटीवर देणार असाल तर सरकार कशासाठी असते? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी कंत्राटी भरतीचा विरोध केला. संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन सरकार काम करत असेल तर आगामी काळात यावर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.