[maharashtradesha]कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाहीये – सुप्रिया सुळे
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये धक्कादायक घटना घडताना दिसत आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'भय इथले संपत नाही' आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.
ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भय इथले संपत नाही आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता नागपूरात देखील २५ रुग्णांचा मृत्यू झाला मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत. औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय."
दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटानं अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकार नावाची चीज शिल्लक राहिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी मृत्युकांडे महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे सत्रच सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यात आणि आता नांदेड व छत्रपती संभाजीनगरात जे भयंकर रुग्णकांड झाले, ते अत्यंत वेदनादायक व संतापजनक आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य, असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱया महाराष्ट्राची मान आज शरमेने खाली झुकली आहे.
महाराष्ट्रात निपजलेल्या सत्तापिपासू मिध्यांच्या गलथानपणामुळे किडे-मुंग्या मराव्यात त्या पद्धतीने सरकारी रुग्णालयांत मृत्यूचे तांडव सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा अचानक मृत्यू झाला. त्या घटनेची चौकशी होत नाही, तोच मागील दोन दिवसांत मराठवाड्यात 53 रुग्णांचा शासकीय रुग्णालयांमध्ये बळी गेला, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.