[divya marathi]कांदा प्रश्नावरील महत्त्वाच्या बैठकीला कृषीमंत्री का नाही?
सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न; सत्तारांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न
कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कृषीमंत्री नाराज असल्याची चर्चा यानिमित्त सुरू आहे. मात्र, यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते नाराज नसल्याचेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
कांदा प्रश्नावर बोलवण्यात आलेल्या बैठकीबद्दल पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे. हा पणनचा विषय आहे, राज्यात अकोल्यात एक कार्यक्रम असल्यामुळे कृषिमंत्री येऊ शकले नाहीत, नाराजी वैगेरे काही नाही. मुंबईत बैठक झाली तेव्हा मंत्री पियुष गोयल यांचे अधिकारी नव्हते म्हणून आज पुन्हा बैठक होत आहे. आज तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे, ठोस तोडगा निघेल अस वाटते, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकाने निर्णय घेतला आहे, असेही सत्तार म्हणाले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीकडे महाराष्ट्रातून जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हि बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या बैठकीसाठी प्रमुख कांदा उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. जर आमंत्रित करुन देखील ते बैठकीला गेले नसतील, तर या बैठकीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे.
वास्तविक केंद्र शासनाच्या असंवेदनशील धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादकांची बाजू केंद्रात जोरकसपणे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी जाणे आवश्यक होते. परंतू या बैठकीला ते उपस्थित नसणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असे म्हणता येईल.