[news18marathi]जालन्यातील घटना ही गृहमंत्रालयाची चूक
सुप्रिया सुळेंचा थेट आरोप
मुंबई, 01 सप्टेंबर : 'महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळे शांततेनं आंदोलन करूया. या सरकारपुढे हात जोडण्याची गरज नाही. हे दडपशाहीचं सरकार आहे, मुलांना अमानुष मारहाण झाली आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामुळे ही चूक गृहमंत्रालयाची आहे, असा आरोपाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला.तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेवरून सुप्रिया सुळे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलत असताना राज्य सरकारवर टीका केली आहे.
'मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू होते. भारतामध्ये संविधान आहे, शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आपल्याला महात्मा गांधींनी आंदोलन करण्याची दिशा दिली होती. 4 दिवसांपासून शांततेत आंदोलन सुरू होतं. पण आज हे झालंच कसं? हे गुप्तचर संघटनेचं अपयश आहे. गृहखातं काय करत होतं. त्यांना दोष देऊन चालणार नाही. एवढी मोठी घटना घडते, एवढा लाठीचार्ज झाला आहे, कोणत्याही समाजात काय, मराठी माणसं आणि मुलं आंदोलन करत होती. त्यांच्याशी प्रेमाने बोललं चाललं पाहिजे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला. याचा मी निषेध करते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
'या आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांकडे मोठी यंत्रणा असते, त्यांना याची माहिती नव्हती का, नुसते विरोधकांना नाव ठेवण्याचे काम करत आहे का? ते स्वत: ला काय म्हणतात, कुणाला कुणाचा मेळ नाही, दोन आठवडे कॅबिनेट बैठका होत नाही. ज्या ठिकाणी अशी घटना होऊ शकते याबद्दल काही माहिती नव्हती का? गृहमंत्री करताय तरी काय? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
'मराठा समाजाने जेव्हा आंदोलन केलं आहे, ते शांततेनं केली आहे, त्यांचा आदर्श अवघ्या देशाने पाहिला आहे. त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला कसा, हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, हे दडपशाही सरकारला विनंती आहे, 200 आमदारांमुळे सरकार बनत नाही, लोकांशी प्रेमाने बोला, जो काही प्रश्न उभा आहे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्या मॅनेमेंट आणि गुप्तचर विभागाचं अपयश आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला.