[loksatta]“अदृश्य शक्तीचा विजय…”
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपापली कायदेशीर बाजू मांडली. अखेर निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल असा निर्णय दिला. या निर्णयावर आता दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा निषेध केला.
माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या, "हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता. जे शिवसेनेबरोबर केलं, तेच आमच्याबरोबर होईल. याची आम्हाला कल्पना होती. शरद पवार यांनी अनेकदा शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. त्यांनी ६० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. आता पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, हे पूर्ण देशाला माहीत आहे. पण काही अदृश्य शक्तींनी आमच्याकडून पक्ष काढून घेतला."
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने उद्यापर्यंत आम्हाला नव्या पक्षासाठी तीन नावे आणि तीन चिन्हे देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करून ते निवडणूक आयोगाकडे देऊ. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे वाचन झाल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तसेच आता विधानसभेत अपात्र आमदार प्रकरणी काय निर्णय होईल? असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काय येईल? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जे शिवसेनेबाबत झाले, तेच आमच्याबाबतही होईल.