[Lokmat]इराण-इस्रायल युद्धादरम्यान देशाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात सुप्रिया सुळेंची महत्त्वाची मागणी
सध्या जगात एक भयावह युद्धजन्य परिस्थिती आहे. अशा वेळी भारत देश म्हणून आपण एकत्रित काय करू शकतो, याची चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने एक सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे आणि त्याच्यबरोबर संसदेत या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी महत्त्वाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भारताचे परराष्ट्र धोरण, वाणिज्य मंत्रालयाचे धोरण, सध्या निर्माण झालेली गॅस टंचाई आणि आपली ऊर्जा सुरक्षितता ही मोठी आव्हाने आज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे ही राजकारण करण्याची वेळ नाही. आज भारतीय माणूस अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने सर्व पक्षांना विचारात घेऊन यावर तातडीने चर्चा करावी. आज जागतिक पातळीवर जी स्थिती उद्भवली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, तसेच याबाबतीत संसदेमध्येही चर्चा झाली पाहिजे कारण हा देशाचा प्रश्न आहे."
"देशाचे परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षिततेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी जे वारंवार बोलत आहेत, ते सत्य होताना दिसत आहे. आज आपण ते अनुभवत असून सामान्य माणसाला हे सर्व भोगावं लागत आहे, याचं दुःख आहे," असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

