[Jai Maharashtra News]देशात गॅसचा तुटवडा? सुप्रिया सुळे यांची सर्वपक्षीय बैठकीची मागणी; केंद्र सरकारला विचारले 'हे' थेट प्रश्न
नवी दिल्ली: मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू आहे. शेतीसह विविध क्षेत्रांवर या संघर्षाचे सावट दिसून येत असल्याचे सांगितले जात असून घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावून गॅस तुटवड्याबाबत सविस्तर चर्चा करावी आणि त्यावर ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. सध्या संसद अधिवेशन सुरू असून या प्रश्नावर सभागृहातही चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या की, देशातील नागरिकांमध्ये गॅस पुरवठ्याबाबत विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत ऊर्जा विषयक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केले आहेत आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांवरून या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे दिसून येते. त्यामुळे केंद्र सरकारने या परिस्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हटले.
यावेळी सुळे यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. गॅस आणि ऊर्जा संदर्भातील माहिती केंद्र सरकार लपवत आहे का? राज्य आणि केंद्र सरकारमध्ये ताळमेळ का दिसत नाही? तसेच आकडेवारी लपवली जात आहे का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. जर गॅसचा तुटवडा खरोखरच निर्माण झाला असेल, तर त्यावर तातडीने मोठा अॅक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सुळे यांनी माध्यमांचे आभार मानत सध्याची परिस्थिती जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील बारामती, पुणे, बीड आणि नाशिक या भागांमध्येही गॅस तुटवडा जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गॅस तुटवड्याचा परिणाम केवळ घरगुती वापरावरच नव्हे, तर हॉटेल उद्योग, लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर असून केंद्र सरकारने यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

