[sarkarnama]निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत
सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका
Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि भाजप वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुमुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर केली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना इंदापूर तालुक्यात अडीच हजार कोटींची विकासकामे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आणली. मात्र, आता दुसरेच लोक येऊन उद॒घाटन आणि पोस्टरबाजी करत आहेत. एकीकडे शेतीमालाला भाव नाही, तर दुसरीकडे महागाई कमी झाली नाही. मग पैसा नेमका जातोय कुठे, असा सवाल करत मुख्यमंत्री आता शेती करायला लागले आहेत. त्यांनी आधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील कळस येथील गावभेट दौऱ्यानिमित्त आलेल्या खासदार सुळे यांनी आपल्या भाषणात भाजप, मुख्यमंत्री यांचा खरपूस समाचार घेत, तरुणी-महिलांना काही सूचना दिल्या. आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील, प्रतापराव पाटील, हनुमंत कोकाटे, डी. एन. जगताप, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, सरपंच सविता सुरेश खारतोडे, उपसरपंच विशाल राजेभोसले आदी उपस्थित होते.
वैशाली पाटलांचे कौतुक...
बंद वाड्यातील महिला वैशाली पाटील यांनी वाड्याबाहेर पडून राजकारणात प्रवेश करत लोकांचे प्रश्न सोडविण्याचे धाडस केले. त्यासाठी त्यांचे पती प्रतापराव पाटील यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. आज गावातील ७० टक्क्यांहून अधिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांचा पुढाकार व योगदान महत्वाचे आहे. एवढं सगळं करत असताना आजही त्यांचा पदर डोक्यावर असल्याची बाब उल्लेखनीय आहे, असे सांगत व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील यांचे खासदार सुळे यांनी कौतुक केले.