[hindustantimes]फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत क्राइम रेट वाढला
सुप्रिया सुळेंची जहरी टीका
Supriyasule on Devendra fadnavis : फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळताततेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. देवेंद्र फडणवीस जेव्हा-जेव्हा राज्याचे गृहमंत्री होतात तेव्हा क्राइम रेट वाढतो. सध्या नागपूर क्राईम कॅपिटल झालं आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मेळाव्याचं आयोजन केले होते.
महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार गटावर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या कार्यशैलीवरच शरसंधान साधले. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. महिला सुरक्षित नाहीत.फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळतात तेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. जेव्हा आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा महिला सुरक्षित होत्या. मात्र आता परिस्थिती तशी राहिली नाही.
अजित पवार गटावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांचा फोटो वापरू नका, असे सांगितल्यानंतरअजित पवार गट आपल्या कार्यक्रमात शरद पवाराच्या फोटोऐवजी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहे. सध्याच्या सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा फोटो मोठा होत आहे. कारण त्यांना माहित आहे, हेडगेवारांच्या नावानं व त्यांचा फोटो वापरून मतं मिळत नाहीत. म्हणून यशवंतरावांचे नाव घेतात. चव्हाण साहेबांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. परंतु त्यांचे नाव घेऊन सध्याच्या सरकारमधील लोकं सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.