[Navarashtra]केंद्राचा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव
मुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक, हुतात्मा चौकात सरकारच्या विरोधात आंदोलन
मुंबई - आज एकिकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना, दुसरीकडे मुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक झाला असून, त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन केले. मुंबई विकास आराखड्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. मात्र, केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारच्या या निर्णयाचा आंदोलकांनी निषेध केला.
मुबंईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न
दरम्यान, मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आम्ही पडेल ती किंमत देऊ. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही, असं पाटील म्हणाले. मुंबईतील हुतात्मा चौकात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या निती आयोगाकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या निती आयोगाकडे देणे म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रकार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. एक प्रगतीशील, सर्वात वैविध्यपूर्ण, मुंबई हे असे शहर आहे जिथे जात, पात, वर्ग, धर्म याची पर्वा न करता सर्वजण एकत्र राहतात. मात्र, ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. हळुहळु महाराष्ट्राचे हृदय हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर निती आयोग जो काही विकासाचा आराखडा राबवले, त्याची गॅरंटी कोण घेणार?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.