[mumbaitak]अमित शाहांची मुंबईत एन्ट्री होताच सुप्रिया सुळेंचा थेट ‘वार’
Supriya Sule Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर स्फोटक आरोप केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी एका पोस्टमधून थेट भाजपवर 'वार' केला. मराठी माणसाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी टीकेची तोफ डागली. (Supriya Sule alleged that Central agencies Misuse by BJP for political agenda)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा बोलतानाचा फोटोही आहे.
या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण 'मराठी माणूस' अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले. पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले", असा थेट आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपवर केला आहे.
पुढे त्यांनी लिहिलंय की, "स्व. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे केले व देशभरात दबदबा निर्माण केला", असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
भाजपवर टीका करताना सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की, "गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने स्व. बाळासाहेब ठाकरे व आदरणीय पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले. पण त्यांची ही ताकद व हे प्रेम भाजपला बघवत नाही."
"आदरणीय पवार साहेबांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी माय-बाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत."
सुप्रिया सुळे
"महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय", असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपवर केला. "महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, परंतू या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपला करत आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे", असे सुप्रिया सुळेंनी अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण 'मराठी माणूस' अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे… pic.twitter.com/pqz05SLiER
— Supriya Sule (@supriya_sule) September 23, 2023