[My Mahanagar]नवले पूल परिसर अपघात शून्य होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरी काय म्हणाले?
नवी दिल्ली : पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघाताची झाला होता. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जबर जखमी झाले होते. एका कंटेनरने अनेक गाड्यांना ठोकर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. या निमित्ताने नवले पूल पुन्हा चर्चेत आला होता. या पुलावर या आधीची अनेक अपघात झाले होते. त्यामुळे नवले पूल कसा अपघातमुक्त करता येईल, याची चर्चा सुरू होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे.
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यास उशीर झाला आहे, याकडे सुप्रिया सुळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी केली. तसेच पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्यासाठीही उपाययोजना करावी, याचीही आग्रही मागणी केली. याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
पुणे कोल्हापूर महामार्ग नऱ्हे भागातून जातो. तिथे अनेक अपघात झाले आहेत. यासाठी दिल्लीतून पथकही आले होते. त्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी झाले असले तरी अपघात होत आहेत. या कामासंदर्भात तुम्ही काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. ते काम पूर्ण कधी होईल? नऱ्हे भागात सतत अपघात होत आहेत. तरीही अपघातशून्य होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती.
नवले पूल आणि अपघात हे समीकरण बनल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना धडकी भरते, हे वास्तव आहे. म्हणूनच येथे अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत होती. सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या महामार्गाचे काम एक वर्षात पूर्ण होईल, असे सांगितले. तसेच कामात काही अडचणी आहेत आणि त्या संदर्भात पुढच्याच आठवड्यात बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय याबाबत कोल्हापूरचे लोकसभा सदस्य आणि इतरांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांचा स्वीकार केला आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

