[sakal]''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर''
आमदाराच्या घरावरील हल्ल्यानंतर सुळे संतापल्या...
मुंबईः बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सोमवारी हल्ला झाला. 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत आंदोलकांनी त्यांच्या घरालादेखील आग लावली. राज्यामध्ये मराठा आंदोलन उग्र रुप धरण्याच्या मार्गावर आहे. प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांना हे झेपत नाहीये. आमदाराच्या घरावर झालेला हल्ला हे सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे.
सुळे पुढे बोलल्या की, माजलगावमध्ये आमदारांच्या घरात लोकं शिरली, महाराष्ट्राला पॉलिसी पॅरॅलीसीस झाला आहे का? राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मराठा आरक्षण प्रकरणात 40 दिवस सरकार काय करत होते? ट्रिपल इंजिन सरकारने ४० दिवसांमध्ये काय केले? कशाच्या आधारावर सरकारने ४० दिवसांचा वेळ मागितला होता? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सोमवारचा सहावा दिवस आहे. समाजाच्या आग्रहाखातर जरांगेंनी पाच घोट पाणी घेतलं. ते म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवत असल्याचं सांगितलं आहे. सरकारने सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असं जरांगेंनी अधोरेखित केलं.