[ETV Bharat]शेती आणि शिक्षणाबाबत या सरकारचं धोरण फक्त जाहिरातीपुरतं
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
पुणे : बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घटली. या घटनेवरुन हळहळ व्यक्त केली जात असतानाच बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात एका शिक्षकानं आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृताचं नाव धनंजय नागरगोजे असं असून ते केज तालुक्यातील केळगाव येथील विना अनुदानित आश्रम शाळेत गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान, या दोन्ही घटनेवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलंय. तसंच यावरुन त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधलाय.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : यासंदर्भात बारामतीत शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ज्या शेतकऱ्याचं सरकारनं कौतुक केलं होतं, त्या शेतकऱ्यानं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर आज एका शिक्षकानं आत्महत्या केली. देवानंतर आपण आई-वडील आणि शिक्षकांना पुजतो. शेतकरी, शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत आहे की, एकदा सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हा सामाजिक विषय असून याला गंभीरपणं घेण्याची गरज आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही. आज राज्यात शेतमालाला भाव नाही. तसेच विक्री होत नाही. शेती आणि शिक्षणाबाबत या सरकारचं धोरण फक्त जाहिरातीपुरतं आहे." तसंच गंभीर विषयाबद्दल सरकार गंभीर नसल्याचंही त्या म्हणाल्या.
देश संविधानानं चालायला हवा : पुढं नवीन विशेष सुरक्षा कायद्यासंदर्भात विचारण्यात आलं असता, "महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर येताय. 100 दिवसात काय झालं हे सर्वांसमोर आहे. हा देश संविधानानं चालायला हवा. तो कुणाच्या भीतीनं चालणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम हे सरकार करतंय. संविधानाच्या चौकटीत काम झालं पाहिजे. हे लोकं विरोधी पक्षातील लोकांना जेलमध्ये टाकतील. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाला संविधानानं दिलेला अधिकार आहे. तो काढून घेता येणार नाही,"असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
