[sakal]कचखाऊ धोरणामुळे हिरे उद्योग सुरतला
मुंबई -'मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, ' असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोडले.
सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी ३,४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. डिसेंबरमध्ये सुरत येथे हिरे बाजार सुरू होणार असून, सुरत हे देशाचे प्रमुख हिरे व्यापार केंद्र म्हणून मुंबईला मागे टाकण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापारी गुजरातच्या सुरत डायमंड बोर्समध्ये तळ हलविण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याचा इन्कार केला आहे.
राज्य सरकार नवी मुंबईत सर्वात मोठ्या हिरे उद्योगाची उभारणी करत आहे. याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. जगातील सर्वात मोठा असा हा हिरे उद्योग असणार आहे