[saamtv]आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चालतंय
'याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...'
ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचं स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असं सुळे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे काल, गुरुवारी शिर्डीत आले होते. भाजपच्या वतीने शिर्डीतील काकडीत विविध सरकारी योजनांचे लाभार्थी आणि शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मोदींनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागलं होतं. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते बरीच वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते, त्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल मोदींनी विचारला होता. त्याला सुप्रिया सुळे यांनी आज, शुक्रवारी सिंधुदुर्गमधील दौऱ्यात उत्तर दिले.
मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच पवार साहेबांवर. त्यांचे स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही, असं सुळे म्हणाल्या. अगोदर पंतप्रधान राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे; ते यावेळी म्हणाले नाहीत. त्यामुळे यावेळी त्यांचे आरोप बदलले, असा टोलाही सुळे यांनी लगावला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी ड्रग्ज प्रकरणावरही भाष्य केले. ड्रग्ज प्रकरण हा राजकीय विषय नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री रोज सांगताहेत की आम्ही एक्स्पोज करणार. मात्र हा विषय सामाजिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी शब्द दिला होता की ते यात लक्ष घालतील, परंतु, अजूनही त्यांनी यात लक्ष घातलेला दिसत नाही. त्यामुळे आता सर्वच बाहेर येऊद्यात, असं आव्हानही सुळेंनी दिलं.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांना अनेक गावांत प्रवेशबंदी केली आहे. या आरक्षणाच्या मुद्द्याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या, 'मला वाटतं हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे. सरकारला ४० दिवसांची डेडलाईन दिली होती. मला वाटलं यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी असेल. काहीतरी प्लान असेल. मग या ट्रिपल इंजिनच्या सरकारने ४० दिवसांचा मॅजिक नंबर आणला कुठून?'
मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगेंना पुन्हा उपोषणाला बसावं लागलं. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत... कुठलाही समाज असू द्या, या सगळ्यांची आरक्षणाची मागणी आहे. सरकारने सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीला बोलवावं. त्यानंतर पाच-दहा दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. त्यात चर्चा होऊ द्या अशी माझी मागणी आहे, असेही सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत असेल, मग ते कुणाचेही सरकार असो, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी कपाशी पिकासाठी अनेक धोरणं राबवली. कपाशीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देत कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा मोबदला मिळवून दिला! pic.twitter.com/ch2u4MYvik
— NCP (@NCPspeaks) October 27, 2023