[Sarkarnama]सुसंस्कृत फडणवीसांना बिनबुडाचे आरोप करणे शोभत नाही..
Parbhani : देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत राजकारणी आहेत, त्यांच्याकडून असे स्टेटमेंट अपेक्षित नव्हते, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी परभणीत पत्रकाराशी बोलतांना व्यक्त केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना होती, त्यांच्याशी चर्चा करूनच तो झाला होता.
त्या सरकारची ऑफर राष्ट्रवादी (Ncp) कॉग्रेसकडूनच देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी केला होता. या संदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, हे स्टेटमेंट देतांना देवेंद्र फडणवीस यांनी समोर कॅमेरा नाही म्हणून बोलतोय अस सांगितल होत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा सुसंस्कृत राजकारणी असे बिनबुडाचे आरोप करत आहे, हे त्यांना शोभणारे नाही. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बेरोजगारी, महागाई कमीसाठी भरघोस निधी दिलेला नाही. शेती, शिक्षण या महत्वाच्या क्षेत्रासाठीही पैशाची तरतुद केलेली नाही असा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील सरकार रामभरोसे सुरु आहे. एकाच मंत्र्याकडे अनेक खाती दिली गेली आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सहा ते सात खाती आहेत. त्यामुळे त्या खात्यांना न्याय मिळत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पत्रकाराची हत्या होते हे दुर्देव आहे.
संविधानाच्या चौकटीत राहून कामे केली गेली पाहिजे, हे होतांना दिसत नाही असे त्या म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, विजय भांबळे, डॉ. मधुसुदन केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर आदींची उपस्थिती होती.