[saamtv]दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत
सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी
राज्यात आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुहेरी नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. संकटाच्या वेळी शेतकऱ्यांची पाठीशी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तर दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन्हीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत आपण सर्वांनीच संवेदनशीलपणे कामाला लागलं पाहिजे, सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे २६०० कोटींची मागणी केली असल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की दिल्लीकडून तातडीने टीम राज्यात बोलवून घ्यावी. केंद्राच्या टीमकडून राज्यातील परिस्थितीची पाहणी करुन घ्यावी. राज्यातील संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लावा. याद्वारे केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या भागात सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी मदतीची गरज आहे. संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. मी ताकदीने हा विषय अधिवेशनात मांडणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत हा विषय मांडतील. कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.