[sarkarnama]नितीशकुमार यांच्या भूमिकेनंतर ताईंचे सूचक वक्तव्य
बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलटफेर झाला आहे. नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज नवव्यांदा शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली दीड वर्षाची आघाडी तोडत नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत गेले. चार वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Nitish Kumar हे देशामध्ये तयार झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे नेते होते. नितीशकुमार यांनीच 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे घेतली होती .आता नितीशकुमार यांच्या 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या विविध पक्षांच्या भूमिका समोर येत आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी आता या नाट्यमय राजकीय घटनाक्रमावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'इंडिया' आघाडीमधून नितीशकुमार बाहेर पडले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडणं हा नितीशकुमार यांचा वैयक्तिक निर्णय होता. लोकशाही आहे. त्यामुळे ते असे निर्णय घेण्यास स्वायत्त आहेत. मात्र मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे एक वर्षापूर्वीचे भाषण आठवते. ज्यामध्ये ते नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झालेत, असे म्हणाले होते. राजकीय विचारधारेचा विचार न करता दिलेला शब्द सतत फिरवायचा ही भाजपची पद्धत झाली आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
बॅचलर राहील परंतु राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले होते. मात्र नंतर त्यापासून त्यांनीही फारकत घेतली. एखादा माणूस विरोधात असताना भाजपकडून त्याच्यावरती टोकाची टीका केली जाते. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा वापर करून माणसं, पक्ष फोडून भाजपची सत्ता कशी आणली जाईल? यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे भाजपला कोणत्याही प्रकारची नैतिकता राहिली नसल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.