[loksatta]“न्याय मागणारे आता…”,
कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) केलं. दुसरीकडे जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत, आज ( २८ मे ) संसदेसमोर 'महापंचायत' भरवण्यात येणार होती.
यासाठी कुस्तीपटू जंतर-मंतरवरून नव्या संसद भवनाकडे कूच करत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्ताव पोलिसांनी कुस्तीपटूंना बँरिकेट्स लावून अडवलं. तेव्हा, कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य आंदोलकांना फरफटत गाडीत बसवलं. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून सुप्रिया सुळेंनी केंद्रातील मोदी सरकारला सवाल विचारला आहे.
Deeply dismayed by the deplorable treatment of our Olympic medalists, @SakshiMalik, @Phogat_Vinesh
— Supriya Sule (@supriya_sule) May 28, 2023
and the rest of the medal winners. The blatant mistreatment of these sportswomen and daughters of India demands accountability.
Did the Union Home Ministry (@HMOIndia) grant… pic.twitter.com/Vp0yzgLscV
ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ऑलम्पिक विजेत्या खेळाडूंना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खूप निराश झालो आहोत. साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्याशी झालेलं गैरवर्तन निंदणीय आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारण्यास परवानगी दिली होती का? यांचं केंद्र सरकारने उत्तर द्यावं."
"ज्या खेळाडूंनी आपल्या देशाला खेळाच्या माध्यमातून सन्मान मिळवून दिला, अशा खेळाडूंना न्यायासाठी लढाई करावी लागत आहे, हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्या खेळाडूंचा विजयानंतर सर्वांनी सत्कार केला. मग आता न्याय मागणारे खलनायक आहेत का?," असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.