[sakal]छगन भुजबळांच्या कबुलीमुळे शरद पवारांवरील ते आरोप खोटे ठरले!
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
मुंबई- शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे म्हणाल्या.
शरद पवार हे अध्यक्ष असताना अजित पवारांनी परस्पर हे निर्णय घेतले होते हे स्पष्ट झालं आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शरद पवारांनी कधीही आपली विचारधारा सोडलेली नाही. त्यांना कधीच भाजपसोबत जायचं नव्हतं. त्यांनी काँग्रेसची विचारधारा कधीही सोडली नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काही राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाण्यासाठी त्रागा लावत होते. त्यामुळे शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कारण त्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं. त्यानंतर महाराष्ट्राची जनता, मीडिया, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी विनंती केली की तुम्हालाच जबाबदारी घ्यावी लागले. याचवेळी छगन भुजबळ म्हणाले होते की, कमिटी वगैरे काही नाही, तुम्हालाच जबाबदारी घ्यावी लागेल, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.
ते म्हणतात पवार साहेबांनीच आम्हाला हा मार्ग दाखवला. तसेच ते हुकूमशहासारखं वागतात असं ते म्हणतात. पण, त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून येतो. अध्यक्ष निवड करताना शरद पवारांनी कमिटी स्थापन करण्यास सांगितले होते. ते तानाशाह असते तर त्यांनी कमिटी स्थापन केली असती का? ते थेट आदेश देऊ शकले असते. कमिटीला छगन भुजबळ यांनीच विरोध केला होता, असं सुळे म्हणाल्या.
मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. पण, तो मला मान्य झाला नाही. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, माझ्या तत्वाशी ते सुसंगत नव्हते. शरद पवार यांनीही वारंवार सांगितलं की ते कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. तुम्ही जाऊ शकता, पण मी येणार नाही असं ते नेत्यांना सांगत होते. गेले साठ वर्ष ते आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, असंही सुळे म्हणाल्या.