[sakal]खासदार सुप्रिया सुळे यांनी केली बोरीमधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी...
वालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) येथील भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेवून नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी करुन शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नसल्याचे सांगितले.बोरीमध्ये गेल्या महिन्यामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतामुळे सुमारे १८० एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या मे.जय किसान बायोकेमफर्ट एलएलपी या खत निर्मिती करणाऱ्या कंपनीचे मालक रणजित शिंदे व खत विक्री करणारे फार्म केअर दुकानाचे मालक योगेश शिंदे यांच्यावर वालचंदनगर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सोमवार(ता.१३) रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी बोरीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी विभाागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे केले नसल्याचे सांगितले.तसेच भेसळयुक्त खत निर्मिती करणाऱ्या कंपनीवरती ठोस कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी सुळे यांनी सांगितले की, बोरीमधील शेतकऱ्यांचे द्राक्ष बागेचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता करु नये मी स्वत: लक्ष घालणार आहे. शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नाही. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा. पालकमंत्री व कृषीमंत्री यांच्याशी बोलून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने शासकीय स्तरावर बैठक आयोजित करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष भारत शिंदे,बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,
सामाजिक न्यायचे विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,माजी उपाध्यक्ष अशोक पाटील,रामचंद्र शिंदे, माजी सरपंच संदिप शिंदे,सतिश शिंदे, हनुमंत धायगुडे, उपस्थित होते.
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करुन शंभर टक्के नुकसान भरपाई द्या...
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी सांगितले की, बोरीमधील सुमारे १५० शेतकऱ्यांचे भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झाले आहे. मात्र फक्त २५ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करुन शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी विभागाकडे केली.