[Jai Maharashtra News]'माझ्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे...'
सुप्रिया सुळे यांनी हात जोडून केली चौकशीची मागणी
Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाचा पाढा वाचतानाच, देशापुढील जागतिक आव्हानांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. "माझ्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे," असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या संदर्भातील प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची विनंती केली. या लढाईत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या खंबीर साथीबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
कुटुंबावर आलेले संकट दुसऱ्यावर येऊ नये
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबावर जेवढं मोठं संकट आलं आहे, तसं संकट दुसऱ्या कुठल्याही कुटुंबावर येऊ नये. या विषयाचा रोहित स्वतः सगळीकडे फॉलोअप घेत असून, महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांची यावर चर्चा झाली आहे. "दादा हा माझा मोठा भाऊ आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संसदेतही आवाज उठवला आहे," असे सांगताना त्या भावूक झाल्या.
जागतिक परिस्थितीवरून सरकारला इशारा
आखाती देशांमधील युद्ध आणि बिघडत चाललेली आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता, सुप्रिया सुळे यांनी भारत सरकारला तातडीने 'ऑल पार्टी मीटिंग' (सर्वपक्षीय बैठक) बोलावण्याची विनंती केली आहे. "ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर एकत्र येण्याची आहे. रशिया-युक्रेन किंवा पेहलगाम हल्ल्याच्या वेळी ज्याप्रमाणे सर्वपक्षीय बैठका झाल्या होत्या, तशीच चर्चा आता होणे गरजेचे आहे," असे त्यांनी नमूद केले. परराष्ट्र धोरणाबाबत सरकारने संसदेत सविस्तर भाष्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इंधन टंचाई आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चिंता
बारामती लोकसभा मतदारसंघातील उद्योगांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी इंधन टंचाईच्या झळा स्पष्ट केल्या. चाकण, इंदापूर, दौंड आणि बारामतीमधील एमआयडीसींमध्ये उद्योजक अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले. "आज इंधनाचे दर वाढले आहेत, परदेशात शिकायला जाणाऱ्या मुलांच्या विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. गल्फ देशांमध्ये राहणारे करोडो भारतीय, तिथले तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे," असे खडे बोल त्यांनी सुनावले.
भारतीय उद्योगांच्या जागतिक प्रगतीचे समर्थन
भारताबाहेर जाऊन व्यवसाय करणाऱ्या टाटा, अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योजकांचेही सुप्रिया सुळे यांनी समर्थन केले. जर भारतीय लोक जगात मोठे होत असतील आणि त्यातून भारताला आर्थिक मदत मिळत असेल, तर त्याचे आपण कौतुकच केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. "आता माणुसकी आणि ऐक्याची वेळ आहे. भारताच्या प्रतिमेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत," अशी विनंती त्यांनी हात जोडून केली आहे.

