[My Mahanagar]गृहखात्याने असेच मन लावून काम केले तर, सावंत प्रकरणावरून सुळे यांनी लगावला टोला
Supriya Sule On Tanaji Sawant : नवी दिल्ली : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचा मुद्दा सोमवारपासून (10 फेब्रुवारी) चांगलाच गाजतो आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोमवार संध्याकाळपासून यायला लागल्या, आणि संपूर्ण गृहखाते, पोलीस खाते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले. याच गोष्टीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकार आणि गृहखात्यावर टीका केली आहे. (rsp mp supriya sule slams state home ministry over tanaji sawant sons issue)
शिवसेना आमदार, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत हे कुणालाही न सांगता सोमवारी (10 फेब्रुवारी) बँकॉकसाठी चार्टर्ड प्लेनने निघाले होते. तर दुसरीकडे ऋषिराज सावंत यांचा फोन लागला नाही, कुणालाही न सांगता ते गेल्यामुळे तानाजी सावंत काळजीत पडले होते. ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली. पण, ऋषिराज सावंत हे बँकॉककडे निघाल्याचे कळल्यानंतर त्यांचे चार्टर्ड प्लेन विशाखापट्टणम येथे थांबवत त्यांना पुन्हा पुण्यात बोलावण्यात आले. ऋषिराज सावंत यांच्यासाठी पोलीस आणि विमान वाहतूक यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळे राज्यासह देशपातळीवर शासकीय यंत्रणेवर एकच ताण निर्माण झाला होता. यावरूनच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा धागा जोडत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना बराच काळ लागला. अजूनही या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधले अजूनही पोलिसांना सापडत नाही. आणि एका मंत्र्याच्या मुलाचा शोध घेण्यासाठी मात्र, अख्खी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करते, हे काही पटत नाही, असे सुळे म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट देखील समाज माध्यमांवर केली आहे.
महाराष्ट्रातील गृहखाते आणि पोलीस किती तत्पर आहेत याचे उदाहरण काल पहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री महोदयांच्या मुलाचे विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेने आपली कुशलता सिद्ध केली. परंतु याच यंत्रणेला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा साठ दिवसांपासून सापडत नाही, ही बाब पटण्यासारखी नाही, असे सुप्रिया सुळे म्हणतात.
कालच्या घटनेत यंत्रणा वरपासून खालपर्यंत हलली आणि सदर नेत्याच्या पुत्राचे विमान हवेतल्या हवेत परत फिरले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले तर कृष्णा आंधळे गजाआड होईल, असा टोला देखील त्यांनी गृहखात्याला लगावला. अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही हा खरा प्रश्न आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
