[sakal]पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली, असा दिवस येईल वाटलं नव्हतं
सुप्रिया सुळेंची खंत
नवी दिल्ली- मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे? मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेले नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याची जनता यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रीम कोर्टामध्ये आज ठाकरे गट आणि शिवसेना गट यांच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावल्याचं सांगितलं जातं. अध्यक्ष निर्देशांचे पालन करत नाहीयेत. त्यांनी पुढील दोन महिन्यांत याबाबत निकाल द्यावा, अशी टिप्पणी कोर्टाने केल्याचं सांगण्याच येत आहे. सुनावणीनंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे प्रकरण न्यायालयात आहे. याबाबत अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ठाकरे गट आणि पवार गटाची याचिका एकत्र करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय मिळेल. नैतिकतेची ही लढाई आहे. व्यक्तिगत लढाई नाही. सत्य आणि असत्यामधील ही लढाई आहे. शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे ही लढाई जनतेची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राहुल नार्वेकर यांनी दिलेले वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने नाकारले आहे. तसेच निकाल देण्याबाबत दिरंगाई होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी नार्वेकर यांना मंगळवारपर्यंत नवीन वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी निर्णय घ्या. विधानसभा अध्यक्षपद हे घटनात्मक पद असले तरी आम्ही निर्णय घेऊ शकतो, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाल्याचे समजते.