[saamtv]जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी
लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या
Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते.
सुळे म्हणाल्या की, ''केंद्रात सरकार असल्यानंतर भाजप ही घोषणा करू शकली नाही. त्यामुळे भाजप सरकारने हा जुमला होता असे मान्य करावे आणि माफी मागावी.'' सुप्रिया सुळे म्हणल्या की, ''केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षात निवडणुका घेऊ, चार वर्षे झाले निवडणुका झाल्या नाहीत. महाराष्ट्रमध्येही काही आमदारांनी अधिकाऱ्यांना झापड मारली आहे. मग दिल्लीत जर चुकीचं घडत असेल तर महाराष्ट्रामध्येही चुकीचे घडत आहे.''
त्या म्हणाल्या की, ''आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे, मान्य आहे. मात्र भाजपनेही आम्हाला चोर म्हटलं. माझ्या बारामती मतदारसंघात येऊन नॅशनल करप्ट पार्टी, असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं याचंही उत्तर सरकारने द्यावं.'' तत्पूर्वी दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा करताना अमित शाह म्हणाले की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही किंवा तो पूर्णपणे केंद्रशासित प्रदेशही नाही. यावेळी त्यांनी दिल्लीच्या इतिहासाचा संदर्भ देत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचाही उल्लेख केला.