[Sakal]पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा मार्ग करा
सुप्रिया सुळे यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र
पुणे - पश्चिम महाराष्ट्राला बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून महाडजवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. या लोहमार्गासाठी सर्वेक्षण करावे आणि याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सद्यःस्थितीत पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही. याशिवाय कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा कोणताही रेल्वेमार्ग नाही. ही परिस्थिती पाहता, लोणंद पासून भोर मार्गे महाडपर्यंत नवीन रेल्वेमार्ग झाल्यास या मार्गाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्यामुळे या नव्या रेल्वेमार्गाचा या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होईल, असेही सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
या नव्या रेल्वेमार्गामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके व खडकवासला विधानसभा मतदार संघ आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. तसेच हा मार्ग पुणे - मिरज - बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
