[कृषी जागरण]गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप
बारामती लोकसभा मतदारसंघातील गुरोळी ता. पुरंदर येथील प्रयोगशील शेतकरी डॉ गणेश जाधव यांनी अंजीर शेती केली आहे. वर्षात दोन हंगामांचे नियोजन आणि पॉलिहाऊसमध्ये लागवडीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श व पथदर्शक ठरली आहे.
डॉ गणेश जाधव हे ॲग्री हॉर्टीकल्चरीस्ट असून त्यांनी या विषयात पीएचडी केली आहे. जाधव यांची १२ एकर शेती असून अंजीर, सीताफळ, डाळिंब, लिंबू, पेरू आदी बागा आहेत. त्यांच्या पत्नी कुसुम जाधव त्यांना या कामी मदत करीत असतात.
त्यांची मुलगी नुतन ही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या विषयात ग्रॅज्युएट आहेत तर मुलगा मंदार हा बीबीए करत आहे. आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने गणेश जाधव हे बारामती कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये अभिनव प्रयोग करीत असतात.
त्याचबरोबर ते शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करतात. जाधव बंधूंकडील सिताफळ आणि अंजीर रोपांना चांगली मागणी देखील आहे. ते अतिशय माफक दरात रोपांची विक्री करतात.
सुशिक्षित बेरोजगार तरुण बागायतदार व्हावेत हा त्यांचा मानस आहे. वाणिज्य मंत्रालयाने सुद्धा त्यांच्या अंजिराचे काैतुक करणारे ट्विट केले आहे. आपणासही जाधव यांचे मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही ९८२२५०७२१३, ८५५१०३७१७१ या नंबरवर संपर्क साधू शकता.