[My Mahanagar]आमच्या मुलांनी कुठे लग्न करावं…
'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनीही अनेकदा मोर्चे काढत त्याविरोधात कडक कायद्याची मागणी केली, अशात एका कार्यक्रमात लव्ह जिहाद वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने मॅट्रिमोनी साईट काढलेली नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या मुलांनी कुठे लग्न करावं, यावरून आमच्या परिवारात ढवळाढवळ करु नका, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी लव्ह जिहाद मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना सुनावलं आहे.
आज आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी सलोखा समितीच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, मनिषा कायंदे, भाई जगताप, रईस शेख आणि सिद्धार्थ मोकळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी लव्ह जिहाद वादावरून सरकारवर टीका केली आहे.
राज्यभरात लव्ह जिहादवरून मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये भाजप नेते, मंत्री, आमदार सहभागी होत आहेत. याचवरून सुप्रिया सुळेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, फोन 5G झाले, एका क्लिकवर जग आलं, पण अजूनही आपण लव्ह जिहादमध्ये अडकलोय. मला आजही लव्ह जिहाद आणि लँड जिहाद माहिती नाही. आज देशातील सर्वात मोठी आव्हानं महागाई आणि बेरोजगारी आहे, पण आपण लव्ह जिहादमध्ये अडकलो आहोत.
राज्यातील सरकारला केवळ काळ्या मातीचे धनी असलेल्या शेतकऱ्यांनी यूटर्न घ्यायला लावला, तो संघर्ष मोठा होता. आमचा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी स्थापन करण्यात आला आहे, त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, अस आवाहनही सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
दरम्यान राज्यात धर्मांतर बंदी कायदा आणण्याची मागणी होते. भाजप अशी मागणी करू शकते. पण देशातील प्रमुख प्रश्न बेरोजगारी आणि महागाई आहे त्यावर ते बोलत नाहीत, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. तसेच भोंगे बंद झाल्याने शिर्डीतील काकड आरती बंद झाली, पॉलिसी मेकिंग एवढं सोपं नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प देशात राबवले जातात, आपण पुरोगामी विचार पुढे नेत योजना आणल्या. माझी सगळ्यांवर श्रद्धा आहे, पण अंधविश्वास कुणावरही नाही, असं स्पष्ट विधानही सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
दरम्यान राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था चांगली नाही, कोकणात पत्रकाराची हत्या होते, कोयता गँग आहे, त्यांनी मान्य केलं कायदा सुव्यवस्था परिस्थिती चांगली नाही, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना जर धमक्या येत असतील तर त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, आत्ताचे देवेंद्र 2.0 आहेत, अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.