[Mumbai Tak]पार्थ पवार प्रकरणानंतर ताईंकडून पुन्हा एकदा दादांची पाठराखण; काय आहे प्रकरण?
पुणे : पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांना धारेवर धरले आहे.
समाज माध्यम X वर त्यांनी ट्वीट करत शताब्दी रुग्णालय हे मुंबई महापालिकेने 500 कोटी रुपये खर्चून बांधलेले आहे. आता हे रुग्णालय PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वानुसार चालवण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी आलेल्या तीन निविदांपैकी एक तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची निविदा आली आहे. हे ट्रस्ट पद्मसिंह पाटील यांचे असून ते अजित पवार यांच्या खासदार पत्नी सुनेत्रा पवार यांचे बंधू आहेत. या ट्रस्टवर अजित पवार यांचे पुतणे आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?सुप्रिया सुळे आज माध्यमांसोबत संवाद साधत होत्या त्यावेळी त्या म्हणाल्या, अंजली दमानिया वारंवार पर्दाफाश करत असतात. इमानदारीने त्या प्रयत्न करत असतात. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढत असतात त्यांचे कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटील यांचा असला तरी त्याचा फक्त सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या पर्यंत सीमित नाही तर राणा जगजितिंह यांच्या पर्यंत जातो. जे भाजपचे आमदार आहेत. ते आता हा ट्रस्ट बघतात. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवांरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.
…त्याबाबत आश्चर्य वाटलं
पालघर हत्याकांतील आरोपीच्या भाजप प्रवेशावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आश्चर्य वाटलं जे आमच्यासोबत काम करत होते त्यांच्यावर आरोप झाले. त्यालाचं आज भाजपने प्रवेश दिला आहे. याच उत्तर भाजपाला द्यावा लागेल. मी ते ऐकायला उत्सुक आहे. महाविकास आघडीच्या काळात काशिनाथ भाऊ यांच्यावर जे आरोप भाजपने केले ते खोटे होते का? याच उत्तर भाजपाला द्यावा लागेल.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पुणे अपघातावर बोलताना त्या म्हणाल्या वारजे आणि नवले पूल परिसरामध्ये वाहतूक कोंडीची भीषण परिस्थिती आहे. नागरिक त्रस्त झालेले आहेत. काहीचं मॅनेजमेंट होताना दिसत नाही. पाणी कचरा आणि वाहतूक कोंडीने पुणेकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. आम्ही अनेक मार्ग सुचवले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हे दुर्दैव आहे.असं त्या म्हणाल्या.

