[Agrowon]देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष
शेतीचा खर्च वाढला आहे. पॉलिहाऊसचे ४० टक्के अनुदान अजून मिळालेले नाहीत. यामुळे शेतीचे उत्पन्न दुपटीने कसे होईल? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. १२ मार्च) लोकसभेत केला. २०२५-२६ या वर्षासाठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवळी त्या बोलत होत्या. त्यांनी सध्याच्या गॅस टंचाई प्रश्नाकडेही सरकारचे लक्ष वेधून घेण्याचाही प्रयत्न केला. देशावर मोठे संकट येणार आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावा, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती की, ग्रीन अमोनिया खत आयात अमोनियाची जागा घेईल. सरकारने ग्रीन अमोनियाबाबत काहीच केलेले नाही. धोरण पुढे गेलेले नाही. नॅनो खत प्रयोगाचे काय झाले?. त्याला अपयश मिळाले असले तरी सरकारने या प्रश्नी काय हस्तक्षेप केला? असे सवालही त्यांनी केले. .
एमएसएमईचे ८ लाख रुपये कोटी सरकारने दिलेले नाहीत. जलजीवन योजनेचा पैसा सरकारने दिलेला नाही. सरकारकडे शाळांसाठी पैसा नाही. पण परदेशी विद्यापीठे देशात येत आहेत. आपल्या देशात अत्यंत चांगली विद्यापीठे आहेत. पण शिक्षणासाठी तरतूद कमी होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी भाष्य केले. मुंबईत पुढील १५ ते २० सिलिंडर मिळेल की नाही, अशी लोकांची चिंता आहे. सरकारने यावर काय उपाययोजना केली आहे? असेही त्या म्हणाल्या.
कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात रोज पाच हजार भाविकांसाठी प्रसाद बनवला जातो. आता रोज दोन हजार लोकांचा प्रसाद बनवला जात आहे. गॅसची सगळीकडे समस्या निर्माण झाली आहे. जळगावातील दागिने परदेशात निर्यात होतात. पण गॅस नसल्याने तेथे दागिने बनवण्याचे काम पूर्ण बंद झाले आहे. कारण गॅस सिलिंडर नाही. पुणे जिल्ह्यातील ७५ टक्के एमएसएमई उद्योग बंद पडले आहेत. कारण त्यांच्याकडे गॅस नाही. बंगरूळ, चेन्नई, पुण, मुंबई येथील रेस्टॉरंट्सची हीच परिस्थिती आहे. सरकारकडून एलपीजी प्रश्नी सरकारकडून निवेदन केले जाईल, असे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
जग सध्या संकटात आहे. हे संकट लवकरच भारतावर येणार आहे. त्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आम्ही देशाच्या हिताच्या दृष्टीने आपल्या सोबत उभे राहू. ऑपरेशन सिंदूर वेळी आम्ही जसी एकी दाखवली होती, तसे पुन्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हिताच्या दृष्टीने एकी दाखवू. आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्वपक्षीय बैठक बोलावा, अशी मागणी त्यांनी केली.

