[ABP MAJHA]सुप्रिया सुळे सांगता सभेत भावूक, अजित दादांच्या आईचं नाव घेतलं,
म्हणाल्या, आशाकाकींना भेटून आले, पण..
बारामती : बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा रंगात आला असून आज (मंगळवारी, ता. 21) सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांनी जोरदार प्रचार केल्यानंतर ही सभा निर्णायक ठरणार मानली जात आहे. सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली असून राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule)उपस्थित आहेत. यावेळी सुप्रिया सुळे बोलताना भावनिक झाल्या.
"गेले दोन-अडीच महिने आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण होते. दादा आज आपल्यात नाहीत, यावर आजही कोणाचा विश्वास बसत नाहीये," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना सुप्रिया सुळे अत्यंत भावूक झाल्या होत्या.
सभेला येण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी 'काट्याची वाडी' येथे जाऊन आशा काकींची भेट घेतली. त्या भेटीबद्दल सांगताना सुळे म्हणाल्या, "पुण्याहून बारामतीला आल्यावर काकींना भेटल्याशिवाय माझे मन अस्वस्थ होते. पण त्यांना भेटल्यावर 'मी सभेसाठी आले आहे' हे सांगण्याची हिंमत माझ्यात झाली नाही. त्यांना मी लग्नाचे निमित्त सांगितले. त्यांच्यासमोर उभं राहताना आजही मन भरून येतं."
अजितदादांच्या विमान अपघाताच्या दिवसाची आठवण सांगताना सभेत शांतता पसरली होती. "सकाळी वेळ होती, जेव्हा पार्थचा फोन आला. त्याने सांगितलं 'डॅडींचं प्लेन पडलंय'. मला विश्वासच बसत नव्हता. आजही डोळे बंद केले की तो दिवस आठवतो. त्या दिवशी अपघातग्रस्त विमान पाहण्याची हिंमतही माझ्यात नव्हती. आजही असं वाटतं की दादा त्या विमानातून चालत बाहेर येतील," असं म्हणताना सुप्रिया सुळे भावनिक झाल्या.
सुप्रिया सुळे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. "ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी पहिल्या दिवसापासून इच्छा होती. वहिनींवर आणि पार्थ-जयवर आज मोठी जबाबदारी आहे. मुलं लहान असली तरी ज्या पद्धतीने ते हे दुःख पेलत आहेत, त्याचा मला अभिमान वाटतो," असेही त्या म्हणाल्या.
"बारामती आणि पवार कुटुंबाचे नाते सहा दशकांचे आहे. बारामतीकरांनी कधीही पवारांची साथ सोडली नाही. आता दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांचे बारामतीसाठीचे स्वप्न आपल्याला एकत्र मिळून पूर्ण करायचे आहे. एक नंबरचे बटण दाबून वहिनींना विजयी करा आणि दादांना आदरांजली वाहा," असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले. या सभेत सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वतीने महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा सुनेत्रा पवार यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीला आल्यानंतर काठेवाडीत गेले आणि आशा काकींना जाऊन भेटले. त्यांच्यासमोर उभं राहिल्यावर मनात एकच प्रश्न आला, मी इथे कशासाठी आलेय, हे त्यांना काय सांगू? काकींशी बोलायची हिम्मतच झाली नाही. शब्दच फुटत नव्हते. अजितदादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही कुणाचाच विश्वास बसत नाही. अनेकदा सहज वाटतं, जिल्ह्यात किंवा तालुक्यात कुठलंही काम असेल तर अजितदादांच्या कार्यालयाला फोन लावावा आणि काम होऊन जाईल. पण लगेच वास्तव समोर येतं, आपल्या घरातला कर्ता पुरुष आपल्यातून निघून गेला आहे आणि त्याचं दुःख शब्दांत मांडणं कठीण आहे. वहिनींवर आता खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मुलंही जबाबदारी पार पाडत आहेत. पार्थ आणि जय आमच्यासमोर अजूनही लहानच आहेत, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
पहिले दिवशी इलेक्शन जाहीर झाल्यानंतर मी माध्यमांच्या समोर येऊन जाहीर केलं हे निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. वहिनींना साथ द्या. बारामतीकरांना सुप्रिया सुळे यांनी मंचावरून विनंती केली आहे. सुनेत्रा वहिनींच्या नावाच्या समोरचं चिन्ह दाबून त्यांना मतदान करा. वहिनींना शब्द देते महाविकास सगळे नेते आणि कार्यकर्ता त्याच्या मागे उभा राहणार आहे. दादांची जीजी बारामतीची स्वप्न आहेत ती आपण सगळे मिळून पूर्ण करू. दादांची आन ,बान ,आणि शान ही संपूर्ण राज्यात टिकून ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
मी वहिनींना शब्द देते की प्रत्येक महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्यासाठी उभा राहील. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होत सर्व आघाडीच्यावतीने मी मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आली आहे, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी नमुद केलं आहे. मुख्यमंत्री येण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण संपून सभेच्या ठिकाणाहून निघून गेल्या आहेत.

