3 minutes reading time (559 words)

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाल्या- आर आर पाटलांचा उल्लेख का टाळला?

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाल्या- आर आर पाटलांचा उल्लेख का टाळला?

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2018, 12:46 PM IST महाराष्ट्रातील जनता आबांना विसरणार नाही- सुप्रिया सुळे

मुंबई- मुख्यमंत्री जेव्हा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत होते तेव्हा त्यांच्याकडून आर. आर. आबांच्या कामाचा किमान उल्लेख होईल असे अपेक्षित होते. कारण विरोधात असताना आर. आर. पाटील यांच्या कामाचा झपाटा आणि ग्रामस्वच्छता अभियानाचे यश मुख्यमंत्र्यांनी अतिशय जवळून पाहिले होते. पक्षीय राजकारणामुळे म्हणा किंवा वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीतीने म्हणा आर. आर. आबांच्या नावाचा उल्लेख त्यांनी टाळला असला तरी ते जेव्हा एकांतात जातील तेव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल यात शंका नाही, असा शालजोडीतील टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र, त्यात दिवंगत माजी ग्रामविकासमंत्री आर आर पाटील यांचा उल्लेख करण्यात आला नाही. तत्कालिन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी 1999 साली हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला होता. राज्यातील जनतेने त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र, आज आर आर आबा आपल्यात नाहीत. त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्त महाराष्ट्रची घोषणा करताच मला आर आर आबांची आठवण झाली अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितली. याबाबत सुळे यांनी सविस्तर ब्लॉग लिहून आबांच्या कार्याला उजाळा व त्यातून मुख्यमंत्र्यांना चिमटेही काढले. सुप्रिया सुळेंनी लिहलेला ब्लॉग आम्ही जसाच्या तसा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

महाराष्ट्रातील जनता आबांना विसरणार नाही- सुप्रिया सुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्याचे वाचताक्षणी मला आर. आर. आबांची तीव्रतेने आठवण झाली. राजकारणातील अतिशय निरागस व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आबांनी मोठ्या कल्पकतेने सुरु केलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आठवले. हे अभियान आबांनी प्रचंड मेहनत घेऊन ते यशस्वी करुन दाखविले. त्याची नोंद राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छतेचे अभियान सुरु करणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याने राज्यातील गावागावांत स्वच्छतेसाठी निकोप स्पर्धा लावली. यातून महाराष्ट्रात खुपच मोठे क्रांतीकारी काम झाले. महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात आर. आर. आबांचे हे काम सुवर्णाक्षराने लिहिले जाईल.

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात स्वच्छता नांदावी, स्वच्छतेमागून समृद्धी यावी असे जे स्पप्न संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आघाडी सरकारने मांडले होते. किंबहुना स्वच्छ भारत मोहिमेची बीजे रोवली होती त्याला हागणदारीमुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून काही अंशी फळे येऊ लागल्याचे पाहून समाधान वाटले. तत्कालिन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील ( आबा) यांनी 1999 साली हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला होता. राज्यातील जनतेने त्याला अतिशय आनंदाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सरकारने ही योजना स्थगित केली. खेड्यापाड्यात स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या संत गाडगेबाबांच्या नावाने सुरु झालेली ही एक यशस्वी योजना स्थगित करुन सरकारने नेमके काय साधले हा संशोधनाचा विषय आहे.

मुख्यमंत्री जेंव्हा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत होते तेंव्हा त्यांच्याकडून आर. आर. आबांच्या कामाचा किमान उल्लेख होईल असे अपेक्षित होते. कारण विरोधात असताना आर. आर. पाटील यांच्य कामाचा झपाटा आणि ग्रामस्वच्छता अभियानाचे यश त्यांनी अतिशय जवळून पाहिले होते. कदाचित उघडपणे त्यांनी आर. आर. आबांच्या नावाचा उल्लेख टाळला असला, किंवा त्यांना तसा उल्लेख करण्याबाबत पक्षीय राजकारणाच्या, राजकारणातील वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीती असावी. पण जेंव्हा ते एकांतात जातील तेंव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल यात शंका नाही.

मुख्यमंत्री साहेब, खरं तर काही गोष्टी राजकारणाच्या पलिकडच्या असतात. त्या वारसा म्हणून जपाव्या लागतात. आपण आर. आर. आबांना विसरलात तरी महाराष्ट्राची जनता मात्र विसरणार नाही. संत गाडगेबाबांचा वारसा घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणाऱ्या आर. आर. पाटील ( आबा) यांची महाराष्ट्रातील जनता कायम ऋणी राहील. कारण माणसं शरीराने निघून गेली तरी ती त्यांच्या कार्याचा अमिट ठसा समाजमनावर सोडून जातात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आर. आर. आबांनी असाच एक न पुसुन टाकता येणारा ठसा महाराष्ट्राच्या समाजमनावर सोडला आहे. तो अनुल्लेखानेही पुसणे तुम्हाला जमणार नाही.

- सुप्रिया सुळे, खासदार https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-supriya-sule-wrote-a-blog-remembering-of-r-r-patil-over-swachata-abhiyan-5855929-PHO.html

राज्यातील मुली व महिला असुरक्षित - सुप्रिया सुळे
हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्याव...