[Sarkarnama]'' मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये करार केलेले 'ते' उद्योजक परदेशातील नव्हे तर..!''
...तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते.
Supriya Sule On CM Eknath Shinde: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती दिली होती. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची गुरुवारी (दि.१९) भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्यावरही भाष्य केलं आहे. सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे ज्या कंपन्यांसोबत चर्चा केली ते उद्योजक परदेशातील नव्हे तर हैदराबादचे आहेत असं मोठं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
याचसोबत त्यांनी हैदराबादेतील उद्योजकांशी करार करण्यासाठी स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे जाण्याची गरज नव्हती. मुंबईत बसूनही उद्योजकांना बोलावले असते तर करार झाले असते असाही टोला लगावला. पण तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते अशा शब्दांत सुळे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.
प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
अन् सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय...
राज्यातील जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक सरकारने लवकर घेतल्या पाहिजे . सत्ताधारी हे त्यांच्या फायद्यासाठी लवकर निवडणूक घेत नसून यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. तसेच नगरसेवक नसल्याने लोक त्यांचे प्रश्न कुठे घेऊन जाणार? अशा सवाल उपस्थित करतानाच प्रशासन नागरिकांना वेळ देत नसल्यानं नागरिकांची कामे होत नाहीत. नगरसेवक प्रशासनाकडे दाद मागू शकत नाही अशा शब्दांत शिंदे फडणवीस सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
पोलीस यंत्रणा सक्षम तरीही गुन्हेगारीत वाढ...
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली असून कोयता गँगची गुन्हेगारी ही मागील तीन ते चार महिन्यात समोर आली आहे. चाकण औद्योगिक परिसरातून कोणता प्रकल्प राज्याबाहेर जात नाही. उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांचा प्रकल्प विस्तारित करत आहेत. पुणे हा मोठा जिल्हा असून सक्षम पोलीस यंत्रणा असतानाही गुन्हेगारी वाढलेली आहे.