4 minutes reading time (740 words)

साडेतीन तासानंतर रेल रोको मागे

साडेतीन तासानंतर रेल रोको मागे

सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली.

प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई |
Last Updated: 20 Mar 2018 11:00 AM


 मुंबई: तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर, अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं.

सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली.

सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेलं आंदोलन साडेतीन तासांनी मागे घेण्यात आलं.  येत्या दोन ते तीन दिवसात मागण्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन रेल्वेकडून अॅप्रेंटिसच्या उमेदवारांना देण्यात आलं. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन हटले.

त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात येत आहे. सुरुवातील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या, त्यापाठोपाठ लोकलही रवाना झाल्या.


दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक विचार झाला नाही, तर आजच्या प्रमाणे अचानक आंदोलन करु, असा इशारा अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी दिला.

अॅप्रेंटिसच्या उमेदवारांचा रेलरोको
रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मंगळवारी सकाळी 7 वा. मध्य रेल्वे ठप्प केली. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल झालं.

विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या.

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत.

संबंधित बातमी अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा पवित्रा घेतला. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत आले. त्यांनी सकाळी सकाळीच रेल्वे बंद पाडल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या. त्यांची भेट घेतली, पण गोयल यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलक विद्यार्थ्यांचा आहे.

20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी
पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

रेल्वे अॅप्रेंटिसच्या मागण्या काय आहेत?
20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा

रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावं

रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावं, भविष्यातही नियम लागू ठेवावा
याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये

पोलिसांचा लाठीचार्ज
अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे ठप्प केल्याने प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. मोठ्या संख्येत अॅप्रेंटिसचे विद्यार्थ्यी रेल्वे रुळावर आले मात्र आरपीएफ किंवा पोलीसांची संख्या खूपच तोगडी होती.

थोड्यावेळाने पोलिसांनी रेल्वेरुळावर उतरुन विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

यापूर्वी अर्धनग्न आंदोलन
यापूर्वी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. रेल्वेने नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातले नियम बदलल्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत, 2 हजार तरुणांनी अर्ध नग्न प्रदर्शन करुन सरकारचा निषेध केला होता.

पंतप्रधान एकीकडे स्किल इंडियाची भाषा करतात, पण मग आमच्यासारखे ऑलरेडी स्किल अवगत असलेले युवक रेल्वे का नाकारते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.


    • अॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनाची रेल्वेकडून दखल, अॅप्रेंटिस उमेदवारांची वेगळी परीक्षा घेणार, या परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डचा निर्णय
  • मुंबई- आंदोलनाला मनसेचाही पाठिंबा,  पियुष गोयलांकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत हटणार नाही, मनसेची भूमिका
    • हे सरकारचं अपयश, अतिशय दुर्दैवी, निंदनीय घटना, एकही अधिकारी अजूनही आंदोलकांपर्यंत कसा पोहोचला नाही? अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न संसदेत उपस्थित करणार : सुप्रिया सुळे
    • रेल्वेभरती परिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत याची गंध वार्ताही सरकारला असू नये हे Intelligence Failure आहेच तसेच  गेल्या 3 वर्षात सातत्य पूर्ण रित्या रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे - धनंजय मुंडे
    • मुंबईकरांसाठी बेस्टकडून विशेष सुविधा, गैरसोय टाळण्यासाठी जादा बस सोडणार,सर्व डेपोंना जादा बस सोडण्याचा आदेश
    • पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रत्युत्तरादाखल आंदोलकांची दगडफेक
    • आंदोलकांना शिवसेनेचा पाठिंबा – खासदार राजन विचारे
    • आंदोलकांनी रेल्वे रोखल्या, पोलिसांनी लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांची दगडफेक केली, तरीही रेल्वेकडून चर्चेसाठी कुणीच अधिकारी नाही
    • आंदोलकांचे प्रतिनिधी सोबत येवो किंवा न येवो, आम्ही रेल्वेमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर मागण्या मांडणार - शिवसेना खासदार अरविंद सावंत
    • आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती नाही? - शिवसेना खासदार अरविंद सावंत
    • रेल्वेमंत्री, अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांशी बोलणार, अन्याय होणार नाही हे पाहीन – किरीट सोमय्या
    • विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांना भेटेन आणि त्यांच्यासमोर मागण्या मांडेन - खासदार गोपाळ शेट्टी
    • विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रामाणिक असल्यास मान्य झाल्या पाहिजेत, पण व्यवस्थेत अडथळा आणणे योग्य नाही - खासदार गोपाळ शेट्टी
http://abpmajha.abplive.in/mumbai/special-examination-will-shortly-be-held-for-apprentices-central-railway-clarification-523547

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको, ‘मर...