2 minutes reading time (401 words)

यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा समारंभ गुरुवारी बालगंधर्वमध्ये

यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा समारंभ गुरुवारी बालगंधर्वमध्ये

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शबाना आझमी, जावेद अख्तर, सुळेंची उपस्थिती

पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरचे यशस्विनी सन्मान पुरस्कार येत्या गुरुवारी (दि. २२ जून) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात येणार आहेत. कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरणाची अंमलबजावणी केली. त्याला २८ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी गेल्या वर्षी 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' सुरु करण्यात आले. यावर्षी महिला धोरणाला २९ वर्षे पुर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून ज्येष्ठ अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी आणि ज्येष्ठ कवी-लेखक जावेद अख्तर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. विविध विषयांवर कथा, कादंबरी यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या सांगली येथील डॉ. सुनिता बोर्डे यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', संपूर्ण सेंद्रिय खतांचा उपयोग करून शेती पिकवणाऱ्या सातारा येथील भारती नागेश स्वामी यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', आपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील लक्ष्मी नारायणन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', विविध माध्यमातून पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या ठाणे येथील शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या नांदेड येथील राजश्री पाटील यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान', कबड्डी खेळाडू व आता प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या नाशिक येथील शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात येणार आहे, असे सुळे यांनी सांगितले.

पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या सहाजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मागच्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशात प्रथमच सन १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा २९ वर्ष पूर्ण होत आहेत. ते जाहीर करण्याची तारीख २२ जून हीच होती. ते औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर या सहा 'यशस्विनी' मिळाल्या असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. असे त्यांनी नमूद केले. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुप्रिया सुळे आणि चव्हाण सेंटरच्या पुणे जिल्हा केंद्राचे सचिव अंकुश काकडे यांनी केले आहे.
वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत
पुणे आकाशवणीचा वृत्तविभाग कधीही बंद करु नका, वृत्त...