1 minute reading time (169 words)

रोहिडेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळ बुरुजाची पावसामुळे पडझड

रोहिडेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळ बुरुजाची पावसामुळे पडझड

तातडीने दुरुस्तीची खा. सुळे यांची मागणी

पुणे: स्वराज्याची साक्ष देणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) गडाच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज बुधवारी (दि. १० ऑगस्ट) रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची दुरुस्ती तसेच किल्ल्यावर जाणाऱ्या गडप्रेमींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा पूर्ण कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सुळे यांनी याबाबत पत्र पाठवले आहे. मुसळधार पावसामुळे गडाच्या प्रवेशद्वाराजवळचा बुरुज ढासळला आहे. तर काही ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी आणखी ढसाळण्याच्या अवस्थेत आहे. पावसाळ्यामध्ये गडाची तटबंदी ढासळण्याचे प्रमाण वाढत आहे. ढासळलेल्या तटबंदीचा दगडी, माती, चुनखडीचा राडारोडा हा पर्यटक ज्या वाटेने गडावर चढतात त्या वाटेवर आला असल्यामुळे गडावरील पाया वाट बंद झालेली आहे.

गडप्रेमींच्या दृष्टीने रोहिडेश्वर हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असून गड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गडप्रेमी तसेच पर्यटक गर्दी करत असतात. तरी या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने गडाची दुरुस्ती होणे तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गडावर तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. रोहिडेश्वर गडाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

बारामती येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रस्त्याच...
कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरू...