2 minutes reading time (335 words)

देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खा. सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खा. सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

महाराष्ट्राचा संसदेतील बुलंद आवाज असल्याचे पुन्हा सिद्ध

 दिल्ली : संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.


देशाचे सर्वोच्च सभागृह संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या नव्या अंकात संसदेतील नोंदींनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत. विद्यमान १७व्या लोकसभेचा अहवाल आहे. यात २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले आणि त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी करण्यात आली आहे.

या पाहणीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला आहे. संसदेच्या आजवरच्या एकूण २२९ चर्चासत्रांत सहभागी होत त्यांनी तब्बल ५४६ प्रश्न विचारले आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी या कामगिरीमध्ये १३ खासगी विधेयके मांडत देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रथमच पटलावर आणत त्यांबाबत कायदा व्हावा अशा सूचनाही मांडल्या आहेत.

संसदेतील खासदार सुळे यांची उपस्थिती ९३टक्के इतकी आहे. याची टक्केवारी पाहता राष्ट्रीय पातळीवर ७९ टक्के तर राज्य पातळीवर ७४ टक्के इतकी भरते. चर्चासत्रांत सहभागाची टक्केवारी राष्ट्रीय पातळीवर ४१.५ तर राज्य पातळीवर ५१.३, खासगी विधेयके राष्ट्रीय पातळीवर १.२ तर राज्य पातळीवर २.४ इतकी आहे. संसदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरासरी राष्ट्रीय पातळीवर १७६ असून राज्य पातळीवर ती तब्बल ३२७ इतकी असल्याचे ई-मॅगेझिनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या पटलावर मांडणे, त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत आणि प्रत्यक्ष भेटीपासून संसदेत आवाज उठवण्यापर्यंत त्याचा पाठपुरावा करणे यासाठी जशा खासदार सुळे या ओळखल्या जातात, तशाच आपल्या विषयाची मुद्देसूद मांडणी, त्याचा सखोल अभ्यास, नेमकेपणाने बोलणे, संसदेचा पुरेपूर मान राखत योग्य तेच बोलणे, जास्तीत जास्त उपस्थिती, चर्चासत्रांत सहभागी होणे इतकेच नाही, त एखाद्या लोकोपयोगी विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून तो खासगी विधेयकाच्या रूपाने पटलावर मांडण्यातही खासदार सुप्रिया सुळे या आपली वेगळी ओळख राखून आहेत. याच कारणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला आहे.
मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणाबाबत खासदार सुप्रिय...
यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्...