1 minute reading time (219 words)

विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खा. सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना टॅग करत खा. सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत कोणतेही महत्वाचे निर्णय होत नाहीत. यामागे समाविष्ट गावांसाठीचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे कारण सांगण्यात येते. याचा मोठा फटका या गावांतील नागरिकांना बसत असून पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबतही अडचणी येत आहेत. ही मोठी काळजीची गोष्ट आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासकीय आणि शासकीय दिरंगाईचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो, हे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिका आयुक्त यांनी तातडीने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करुन तो मंजूर करण्यासंबंधी सकारात्मक विचार करुन कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पालखी मार्गावरील कामाची ...
धायरी, आंबेगाव नऱ्हे परिसरात घाण, कचरा, खड्डे आणि ...