By Editor on Monday, 09 March 2026
Category: Press Note

अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची केवळ घोषणाच; निधीची तरतूदच नाही

खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप



पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही, असे सांगत ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून हा प्रकल्प नेमका कधी व कसा पुर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यातील नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत त्यांनी केलेल्या घोषणेचा उल्लेख करत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले असून ही निव्वळ घोषणा ठरू नये, ठोस निधीची तरतूद करून लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात यावी, म्हणजे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त नागरिकांत संभ्रम राहणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतल्या शेतजमीनी ओलिताखाली आणणे तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना हे स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायती भाग हा शिक्का कायमस्वरुपी पुसून टाकणे ला जाणे शक्य आहे. त्यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते, असे सुळे यांनी म्हटले आहे.


अवघ्या दीड महिन्यांपूर्वी २४ जानेवारी २०२६ रोजी बारामती तालुक्यातील कण्हेरी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. आपण या योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून त्या माध्यमातून सुमारे अडीच टीएमसी पाणी साठविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. दुर्दैवाने आज आपल्यात अजित पवार नाहीत. त्यांच्या जागी अर्थमंत्री या नात्याने फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी विविध प्रकल्पांची घोषणा केली. अगदी नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला मात्र त्यासाठीच्या निधीच्या तरतुदींचा उल्लेख मात्र केला नाही, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्षात आणून दिली आहे.

राज्यातील इतर सिंचन प्रकल्पांच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी निधीसहीत केल्या आहेत. यात बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत मात्र त्यांनी निव्वळ घोषणाच केल्याचे दिसते आहे. त्यामुळे शासनाची या प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका आहे, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हा प्रकल्प या भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असून या माध्यमातून येथील जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार आहे. या भागातील नागरीकांची होणारी सोय आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी शासनाने भरीव तरतूद करावी, अशी मागणी सुद्धा सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Enter your text here ...

Leave Comments