By Editor on Monday, 08 May 2023
Category: Press Note

मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पुणे : महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याच्या वृत्तांमुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत सरकारने तातडीने काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

राज्यात तसेच देशातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहे. याशिवाय मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले असल्याचे या वृतांवरून दिसत आहे. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का, असा सवाल खासदार सुळे यांनी उपस्थित केला आहे.

या घटनेवर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का, असे म्हणत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. 

Leave Comments