सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली 'ही' मागणी
वाशिम : शाळेत जात असताना एका शिक्षकाला अनोळखी आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ही घटना सोमवारी मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डडी सस्त्यावर घडली. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त करत आरोपींवर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
सुनील ऊर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे असे मृत शिक्षकाचे नाव असून ते मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. सोमवारी सकाळी ते दुचाकीने शाळेत जात असताना कोल्ही बोर्डी रस्त्यावर आरोपींनी त्यांना अडवले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. बराच वेळ सोनवणे गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. नंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, कोल्ही बोर्डी, जि. वाशिम येथे शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अडवून त्याला मारहाण करून जीवंत जाळल्याची घटना घडली. हा प्रकार अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि चीड आणणारा आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. गुन्हेगार निर्ढावले असून दिवसाढवळ्या गुन्हे करत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून गुन्हेगारांना गजाआड करावे. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे.
हा गुन्हा शेतीच्या वादातून घडल्याची चर्चा असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रण हाती लागले असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे जऊळका रेल्वेचे ठाणेदार प्रदीप राठोड यांनी सांगितले आहे.