सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती. तेथे यासंदर्भात चर्चा होणार होती. राजभवन ते जेथे मंत्रिमंडळाची बैठक झाली ते सह्याद्री अतिथीगृह हे अंतर केवळ पाच ते सहा मिनिटांचे आहे. पण तिकडे या आमदारांपैकी कुणीही गेले नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.