By newseditor on Saturday, 10 February 2018
Category: महाराष्ट्र

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

'शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?' असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. मनमाड तालुक्यातील अंदरसुल इथं त्यांची सभा झाली. त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली. कांद्याला भाव नसल्यानं कृष्णा डोंगरे यांनी 5 एकर शेतातला कांदा जाळला होता.

नांदगावमध्ये शेतकऱ्याने जाळलेला कांदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना भेट देणार आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याने काल आपल्या 5 एकर शेतातील कांदा जाळला होता. सुप्रिया सुळे येवल्यात आल्या असता त्यांनी नगरसूल येथे जाऊन कृष्णा डोंगरे यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी त्यांनी जळालेला कांदाही त्यांनी सोबत घेतला. ‘यूपीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का नाही?’ असा सवालही त्यांनी विचारला.

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. ‘आम्ही राजीनामा देऊ, आम्ही राजीनामा देऊ, हे म्हणजे लांडगा आला रे आला यासारखं झालं आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाघ राहिलेला नाही. त्यांचं आत मांजर झालं आहे. दोन कोंबडे भांडतात तसे उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे रोज भांडतात.’ अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी केली.

 शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

Leave Comments