विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही बाकं वाजवली
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्यांनी आभार मानले.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, पाच वर्ष कशी निघून गेले कळालच नाही. दोन वर्ष तर कोविडमुळे गेली, त्यात सर्वांचच नुकसान झालं. त्यानंतर सावरुन आपल इथवर आलो आहोत. पाच वर्षांत अनेक नवीन मित्र लाभले. विरोधकांशी अनेक वादही झाले. कधी आम्ही तुमच्यावर नाराज, तर कधी तुम्ही आमच्यावर नाराज, असं सगळं घडलं.
आपली बॅच अशी असेल ज्यांनी दोन्ही संसदेत (जुन्या आणि नवीन) काम केलं आहे. संसदेच्या जु्न्या इमारतीत अनेक आठवणी आहे. देश ७० वर्षात जसा उभा राहिला, त्यात योगदान असलेल्या अनेक दिग्गजांच्या त्या इमारतीत आठवणी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
बारामती लोकसभेतील सर्व नागरिकांचे मी आभार मानते, ज्यांनी मला इथे निवडून पाठवलं. पक्षाकडून आभार आता आभार मानत नाही, कारण पक्ष अजून थोडा इथे आणि थोडा तिथे आहे. आता कोर्टच याबाबत निर्णय देईल.
राजकीय लढाई सुरुच राहील. मात्र आपल्या वैयक्तिक संबंधात कटुता येऊ नये हीच अपेक्षा करते. हीच लोकशाहीची ओळख आहे. देशाच्या विकासात सर्वांनी एकत्र काम करायला हवं. सगळ्यांचे मी पुन्हा आभार मानते, असं म्हणत सुप्रिया सुळे आपलं भाषण संपवलं. सुप्रिया सुळे यांच्या भाषणानंतर सर्व खासदारांनी टाळ्या वाजवून दाद दिली.