सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी
लम्पी या आजारामुळे देशातील शेतकऱ्यांना पशूधन वाचविण्यासाठी मोठा खर्च आला आहे. त्यामुळे . या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचार व्हायला हवेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली आहे. लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक जनावरं दगावली आहे तर जवळपास तीस लाखॉजनावरांना लागण झाली आहे. या आजारामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करण्याची गरज असल्यातं त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभेत नियम 377 अंतर्गत बोलताना त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात लम्पी आजारामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. या आजारामुळे हजारो शेतकऱ्यांनी पशुधन तर गमावलेच शिवाय त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे, असं त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिलं. . शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेतलं पाहिजे, असंही त्यां म्हणाल्या.
लंपीचा प्रत्येक वेळी नवा विषाणू येत आहे, असं पशुतज्ञ सांगत आहेत. त्यामुळे हा लम्पी घातक आजार आहे. या आजारावर एकच लस प्रभावी ठरत नाही. त्यामुळे रोगाचं संशोधन करुन त्यावर प्रभावी लस तयार केली तर भविष्यात लम्पीमुळे पशुधनाचं नुकसान टाळण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील परिस्थीती काय?
राज्यात 35जिल्ह्यांमध्ये तीन लाख 54 हजार 247 पशुंना संसर्ग झाला आहे. त्यापैकी दोन लाख 71 हजार 465 पशू उपचाराने बरे झाले आहेत; मात्र 24 हजार 767 पशुंचा मृत्यू झाला आहे. नुकसान भरपाईपोटी जनावरांच्या मालकांना 29 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. एक कोटी 39 लाख 47 हजार पशुंचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
लम्पी रोखण्यात राज्यात पुणे अव्वल
प्राण्यांना होणाऱ्या लम्पी विषाणूचा संसर्ग राज्यभरात कमी होत आहे. त्यात लम्पी रोखण्यात पुणे अव्वल ठरलं आहे. मृत्युमुखी झालेल्या पशुंपैकी सर्वांत कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे जिल्ह्यात केवळ 633 तर बुलढाणा ) जिल्ह्यात सर्वाधिक 4,510 पशुंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला लम्पी रोखण्यात यश आलं आहे.