By Editor on Thursday, 26 January 2023
Category: मुळशी

[Sakaal]लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान-सुप्रिया सुळे

हिंजवडी : ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती देखील होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. शेतीच्या लाल मातीशी इमान राखत शेती सोबत असलेलं नातं हिंजवडीकर प्रामाणिकपणे जपतात ही एक चांगली बाब आहे.आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खास ओळख आहे असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी शिवारात केले.

हिंजवडी आयटी हब म्हणून जगभर प्रसिद्ध!

शहरीकरण झालेल्या हिंजवडीने ग्रामिण बाज जपत पारंपारिक शेती मोठ्या जिद्दीने राखली. महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे चक्क हिंजवडी शिवारात भरघोस उत्पन्न निघाल्याची कुनकुन खासदार सुळे यांना लागताच रोखठोक असलेल्या सुळे बुधवारी (ता. २५) दुपारी बाराच्या सुमारास त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे कौतुक करण्यासाठी चक्क हिंजवडी शिवारात बैलगाडीने दाखल झाल्या.

स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करत त्यांनी बांधावरच शेतकऱ्यांशी संवाद साधला सुळे बुधवारी मुळशीच्या दौऱ्यावर होत्या. दौऱ्याची सुरवात त्यांनी हिंजवडीतील स्ट्राबेरी शेतीची पाहणी करून केली. हिंजवडीचे माजी सरपंच मल्हारी साखरे यांनी मुळा नदीकाठच्या शेतीत घेतलेल्या स्ट्राबेरी पिकाची व सेंद्रीय फळबागेची पाहणी केली.

साखरे कुटूंबाचे शेतातील प्रयोगशील काम पाहून समाधान व्यक्त केले. दौऱ्याच्या सुरुवातीलाच बैलगाडीत बसवून सुळे यांचे हिंजवडीकरांनी जंगी स्वागत केले. मल्हारी साखरे यांनी शेतात पिकवलेला सेंद्रिय भाजीपाला व फळांची सुळे यांना अनोखी भेट दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजाभाऊ हगवणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवा नेते सुरेश हुलावळे, युवक अध्यक्ष सागर साखरे, पंचायत समितीच्या माजी सभापती कोमल बुचडे, राधिका कोंढरे, आयटीनगरीचे सरपंच सचिन जांभुळकर, माजी सरपंच दत्तात्रय साखरे, विक्रम साखरे, विशाल साखरे, शिवनाथ जांभुळकर, वसंत साखरे, योगेश शिंदे, गणपत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष द्यावे

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दोन दिवसांत निर्णय घेतील. असे सांगताना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपावर टीका केली.

त्या म्हणाल्या फडणवीस हे एक सुसंस्कृत माजी मुख्यमंत्री आहेत परंतु ते एवढे खोटे बोलतात हे पटणार नाही. पुण्यात भरदिवसा गोळीबार घडतो, कोयता गॅंग दहशत माजवते याबाबत ते चकार शब्द पण काढत नाहीत. त्यांनी गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष द्यावे असेही त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या

Supriya Sule : लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान; सुप्रिया सुळे | Sakal

Leave Comments