[ETV Bharat]'नसरापूर प्रकरण स्वतः मॉनिटरिंग करणार, गुन्हेगाराला फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही',
मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना आश्वासन
मुंबई : नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याबाबत अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सोडू नये, असा निर्णय झाला आहे. याप्रकरणी आज नसरापूरचे सरपंच आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लवकर कारवाई व्हावी असे निवेदन दिले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, "या प्रकरणी मी स्वतः मॉनिटरिंग करणार असून यातील गुन्हेगाराला फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः केस मॉनिटरिंग करणार : याबाबत अधिक माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, "नसरापूरच्या सरपंच संग्राम थोपटे यांच्याबरोबर दोन वर्ष मी काम केले. इतर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि मी सगळ्यांनी एकत्र मिळून माणुसकीच्या नात्याने एकत्र आलो होतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, अतिशय तातडीनं ते स्वतः ही केस मॉनिटरिंग करतील. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत मी जातीनं लक्ष देणार आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमचं न्यायमंत्र्यांवर विश्वास आहे, त्यामुळं आता पुढे केसचं काय होईल त्याचा आम्ही सगळेजण मिळून फॉलोअप घेऊ."
महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना : "नसरापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे, जी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ठरली आहे. या सर्वाचा महाराष्ट्रच नव्हे देश निषेध करत आहे. आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणात आरोपील जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत फॉलोअप घेतला पाहिजे. माध्यमांचे देखील आभार मानते की, सर्वांनी हे प्रकरण उचलून धरलं. कायदा आहे परंतु त्याचा फॉलोअप घेणं महत्त्वाचं आहे. त्याचा लॉजिकल फॉलोअप घेऊन याबद्दल आरोपीला फाशीच होईल यासाठी सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे, असंही सुळे यांनी ठामपणे सांगितलं. खरात प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता त्यामध्ये चौकशी व्हावी अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे.
शक्ती कायदा चांगल्या प्रकारे राबवला जावा : उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना शक्ती कायदा मांडला गेला होता. त्यामध्ये आम्ही अनेक सुधारणा सुचवल्या होत्या. त्या दिल्लीला देखील पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर काहीच काम झालं नाही. पण आता आम्ही विनंती करतो की शक्ती कायदा जो आम्ही आणला होता तो अधिक चांगल्या प्रकारे राबवला जावा, त्यामध्ये राजकारण केलं जाऊ नये. त्यामुळं महिलांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या त्रुटी, कायद्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर होतील अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.

