[My Mahanagar]गेली दीड वर्ष हे सरकार जनतेचा पैसा अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का? सुप्रिया सुळेंचा सवाल
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील राज्यातल्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता 80 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतला लाभ यापुढे भेटणार नाही. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेचा पैसा गेली दीड वर्ष हे सरकार अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे दीड वर्षांने सरकारला या योजनेत 80 लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा? ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जनतेच्या कष्टातून निर्माण झालेल्या कर रुपी पैशांतून ही योजना चालविली जाते. थोडक्यात जनतेचा पैसा गेली दीड वर्ष हे सरकार अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण ही संपूर्ण बाब मूळात या सरकारचे घोर अपयश उघड करणारी आहे. तसेच दिलेला शब्द पाळणारे हे सरकार नाही. केवळ निवडणुकीतील फायदा गृहित धरून त्यांनी महिलांना खोटे आमिष दाखविण्याचा उद्योग केला, असे यावरून स्पष्ट होते. तब्बल ऐंशी लाख महिलांना अपात्र घोषित करून या सरकारने राज्यातील महिलांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप सुळे यांनी केला.
अपात्र महिलांच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 80 लाख हा आकडा छोटा नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीस 'लाडकी बहीण' योजनेचे लाभ नियमितपणे मिळालेच पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. यासाठी त्यांना विशिष्ट मुदतीत केवायसी करण्याची आडकाठी असू नये. राज्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी त्यांना केवायसी करण्याची संधी कायम उपलब्ध करून द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

