[Time Maharashtra]‘जीएसटीचा हा निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’ खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडून या रिफॉर्मला खोटारडेपणा असं संबोधण्यात आलं. नरेंद्र मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. "आपली आर्थिक परिस्थिती आणि आरबीआयची पॉलिसी यात मोठे अंतर आहे. आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे, पण हा निर्णय जर पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज उत्सवाची गरजच पडली नसती," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या म्हणाल्या की, "पाच वर्षांपासून पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्ट मत होते की जीएसटीच्या काही टप्प्यांमध्ये चुका आहेत. तरी देखील सरकारने आता तो निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना, घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत."
"आमदारांना दोन कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसताना मला २० कोटी रुपये निधी मिळतो," असा दावा एका माजी आमदाराने केला आहे. या मुद्द्यावर संताप व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "असे प्रकार घडत असतील तर त्याचे उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यायलाच हवे." त्या पुढे म्हणाल्या की, "देशाचे पंतप्रधान शपथ घेतल्यानंतर एका भाषणात म्हणाले होते की ते या देशाचे 'प्रधान सेवक' आहेत. पण जर असे घडत असेल तर महाराष्ट्राचे सरकार नरेंद्र मोदींचेही ऐकत नाही, असे दिसते," अशी धडाकेबाज टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील तब्बल २६ लाख लाडक्या बहिणींची नावे सरकारने कमी केली असून, या योजनेत सुमारे ४९०० कोटी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचे सरकारच्या आकडेवारीतूनच स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या म्हणाल्या की, "हे पैसे पुरुषांनी काढले असे सांगितले जाते, पण हे पैसे गेले कुठे याचे उत्तर सरकारने द्यायलाच हवे."

